अन्न हे पूर्ण ब्रह्म-


           आपण लहानपणापासून ऐकत आलोय अन्न हे पूर्ण ब्रह्म. अन्नाला जागणे,खाऊन माजावे पण टाकून माजू नये,भरल्या ताटावरून ऊठु नये,अन्नाचा अपमान केला तर अन्नान्न दशा येते वगैरे वगैरे. लहानपणी वदनी कवळ घेता म्हणूनच जेवायचे आणि  पानात टाकायचे नाही हे दोन नियम शिकलो.अन्नाने आपले पोषण होते. मग ह्या अन्नाचा आदर का नाही राखला जात सगळीकडे ? काही लोक अभिमानानी सांगतात, आमच्याकडे  सकाळचं संध्याकाळी  चालत नाही,उरलं तर आम्ही फेकून  देतो.लग्नसमारंभ,पार्ट्या,हाॕटेल्स् इथे कितीतरी अन्न वाया जातं. जेव्हा माहित आहे की आपल्या देशात लाखो लोकांना अन्न मिळत नाही.

ह्या संदर्भात नेहमी येणार्या दोन पोस्ट मला खुप आवडतात.
आपल्याकडचे काही लोक जर्मनीत गेले. प्रचंड भूक लागली म्हणून एका हाॕटेलात गेले. खुप काही मागवले,भूक भागल्यावर उरलेले टाकून देऊन,बिल देऊन निघाले.तेव्हा पलीकडच्या  टेबलावरच्या काही आजीबाईंनी अडवलं. चक्क रागे भरल्या. उरलेलं पार्सल करून घेऊन जा,म्हणुन मागे लागल्या. एकानी गुर्मीनी विचारले ,आम्ही बिल भरलय,तुम्हाला काय करायचय? तेव्हा आज्या चवताळल्या,चिडून बोलल्या,ही आमची राष्ट्रीय संपत्ति आहे,तीचा अपव्यत करायचा अधिकार कोणालाही नाही.

दुसरी पोस्ट,खुप देशात तुम्ही काॕफीशाॕपमधे गेलात तर एक काॕफी स्वतःला घेऊन, तुमच्या इच्छेप्रमाणे एक किंवा अधिक  काॕफी सस्पेंडेड किंवा  आॕन द वाॕल घेऊ शकता.जी नंतर एखाद्या गरजू गरीबाला दिली जाते.किती छान पद्धत आहे ना?

मग हा awareness  आपल्याकडे  का नाही?
एकदा आम्ही हाॕटेलमधे गेलो होतो. पलीकडे  आई वडील,छोटी मुलगी बसली होती. मागव मागव मागवलं आणि  बरचसं टाकून दिलं. मी वेटरला विचारलं ह्या अन्नाचं काय करणार? तो म्हणाला टाकून  देणार, मी त्यांच्या टेबलापाशी जाऊन बोलले,एवढं महागाचं,ताजं चांगलं अन्न आहे, पार्सल का नाही करून घेत? मुलगी आणि  तीची आई अर्थातच माझ्याकडे  अत्यंत तुच्छतेने,काय येडपट बाई आहे म्हणुन बघत होत्या. पण मी माझे म्हणणे पुढे रेटल्यावर बाबा म्हणे, अहो,पण आम्हाला नको आहे. मी म्हटलं,जाताना सिग्नलला भेटलेल्या गरीब मुलांना द्या ना.मग त्यांना पटलं.

पण ह्याही वरताण एक  गोष्ट वाचली,असं म्हणे आपण चांगल्या मनानी कोणाला खायला दिलं तर थोडं खाल्ल्यावर ते गडाबडा लोळायला लागतात आणि  ते खाणं बाधलं असं दाखवून पैसे उकळतात.

आमच्या आॕफिसमधे दर चतुर्थीला त्या महिन्यात निवृत्त होणारे लोक सर्व आॕफिसला साबुदाणा खिचडी,बर्फी आणि  मसाला दूध देतात. जे आमचेच एक सहकारी,ज्यांचा घरचा केटरींगचा व्यवसाय आहे ते बनवून आणतात.एका महिन्याला खिचडी खुपच छान झाली होती. सेक्शनमधे तेच कौतुक चाललं होतं तेवढ्यात आमच्या एक सहकारी आल्या आणि  म्हणाल्या," शी, काय खिचडी झाली होती? आम्ही सगळ्यांनी चारचार प्लेटी घेतल्या आणि  टाकून  दिल्या." मी रागानी म्हटलं,"अहो,चार नाही,प्रत्येकी एकच प्लेट होतीआणि  छान झाली होती खिचडी,एवढ्या सुगरणी असाल तर इथे खात जाऊ नका."
वरची माझ्या छोट्या अनुभवातील प्रातिनिधिक उदाहरणं.पण हा बेजबाबदारपणा आणि  बेमुर्वतपणा,कसा दूर करायचा? काही संस्था,हाॕटेल किंवा समारंभात उरलेलं ताजं अन्न,व्यवस्थित,स्वच्छपणे गोळा करून गरीब वस्त्यातून वाटतात. काही हाॕटेल बाहेर फ्रिज ठेऊन,उरलेलं ताजं अन्न फाॕईलमधे ठेवतात,हवं त्यांनी घेऊन जावं. पण ह्या संस्था थोड्या आहेत आणि अशा योजना किती दिवस व्यवस्थित चालत असतील माहित नाही.
मला वाटतं,आपणा सर्वांना,विशेषतः गृहिणींना वाटतं कि त्यांनी प्रेमानी,सर्वांच्या आवडी जपत केलेले पदार्थ  जर जास्त असतील तर  ते वाया जाऊ नाहीत. मग आपण उरलेल्या पदार्थांना नवे रुप देऊन,नवे पदार्थ करतो. पार्टीत उरलं तर फाॕईल किंवा डबे भरून घरोघरी देतो,त्यामुळे अन्न वायाही जात नाही आणि  पाहुण्या गृहिणीला घरी जाऊन संध्याकाळी  स्वैपाकही करावा लागत नाही. आपण प्राणी,पक्षी यांनाही खायला देतो. ते आपल्यापेक्षा व्यवस्थित असतात. पोटाच्यावर खात नाहीत. माझ्या कुत्र्याने खाताना उडवलेली शिते,नंतर पारवे येऊन खाऊन जातात. अंड्याचा पिवळा बलक नको असेल तर अर्ध्या कवचात ठेवला तर कावळा अलगद,न सांडता घेऊन जातो. उरलेली पोळी, भाकरी,पराठा चुरुन वाडग्यात ठेवला तर चिमण्या,बुलबुल खाऊन जातात.
प्रत्येकानी पहिला घास घेताना, आपल्याला अन्न पुरवणारा निसर्ग,प्राणी,शेतकरी,,भूक तहानेची पर्वा न करता आपले संरक्षण करणारे सैनिक,पोलीस,अन्न शिजवणारे आणि  वाढणारे हात ह्यांचं कृतज्ञतेनी स्मरण केलं तर अन्न वाया घालवायची इच्छाच होणार नाही.
मला सुचलं ते लिहिलं.विषय महत्वाचा आहे म्हणून लांबला. तुम्हीही सुचवा नं अन्न वाया जाऊ न देण्याचे आणि ते  योग्य लोक,पशु,पक्षांपर्यंत पोचवण्याचे आणि सर्वांच्या जाणिवा जागृत करण्याचे सहज सोपे उपाय, जे तुम्ही करत असाल किंवा तुमच्या मनात असतील.

                 विशाखा टिपणीस
                 १९/०१/२०१८

माझी मैत्रीण

ही पाहिलीत का माझी मैत्रीण वरच्या फोटोतली? काय म्हणता, तुम्ही ओळखता? पांढर्या ड्रेसमधली? लेखिका आणि  प्रसिद्ध  सिनेसमिक्षक सुलभा तेरणीकर...