Gulabjam -Marathi movie Review

काल ' गुलाबजाम' पाहिला. आवडला. ह्या सिनेमानी मला खुप विचार करायला भाग पाडले. सिनेमा आवडण्याचे कारण तो बर्यापैकी वास्तव आहे आणि  positive  आहे.
जीला भूतकाळच्या आठवणी नाहीत,भविष्यकाळची स्वप्न नाहीत अशी नायिका,परिस्थितीने एकदम एकाकी झालेली, आयुष्याची मधली वर्ष हरवल्याने वय वाढलं तरी व्यवहार न येणारी, थोडी विचित्र,सायको,कोशात रहाणारी पण जी पाककला ती विसरली नाही ती फक्त  तीच्या निर्वाहाचं साधन नाही,त्यात तीचं पूर्ण मन आहे.आज जिथे अभ्यास झाला नाही,नापास झाले,आई रागावली असल्या कारणांवरून मुले आत्महत्या करतात तिथे ही खंबीरपणे जगत्ये. मरण्याचा विचार तीच्या मनातही येत नाही.
नायक, तरुण देखणा,श्रीमंत,सुशिक्षित,इंग्लंड मधे चांगल्या पगाराची नोकरी असणारा,त्याला girlfriend ही आहे,जिच्याशी त्याचा नुकताच साखरपुडा झालाय.एकंदर काहीच कमी नाही. पण न आवडणारं शिक्षण घेऊन पैसे कमावल्यावर त्याला त्याच्या आवडीप्रमाणे महाराष्ट्रियन rather पुणेरी authentic  जेवण करायला शिकून,इंग्लंड मधे हाॕटेल काढायचय,ज्याच्या चालण्याची खात्री नाही.लहानपणापासून त्याच्या स्वैपाकाच्या आवडीला घरच्यांनी सुरुंग लावलेला आहे. योगायोगाने,खुप अडचणींनंतर तो नायिकेकडे स्वैपाक शिकू लागतो आणि त्याच्यातला संवेदनशील माणूस तीच्या वास्तवाने हेलावून जातो. तीचा शिष्य बनता बनता तो तीचाच पालक बनतो.तीचं आयुष्य जास्त चांगलं,यशस्वी करण्यासाठी धडपडतो. ज्यावेळी लक्षात येतं की तो तीच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनतोय,ती त्याच्यावर अवलंबून आहे तेव्हा तो तीच्या काॕलेजचा भेटलेला मित्र ज्याला ती विसरली आहे पण तो मित्र अजुनही तीच्याविषयी नाजुक भावना बाळगून आहे,त्याला तीच्या आयुष्यात अगदी सहज सामिल करू इच्छितो.नायकाच्या इंग्लंडला जाण्याने नायिका एकाकी होऊ नये म्हणुन.स्वतःच्या स्वप्नाला तो तिलांजली देत नाही आणि तीलाही बेसहारा करत नाही.
त्याचं इंग्लंडला जाणं दोघही accept करतात,कितीही दुःखद असलं तरी एकमेकांसाठी ते सोपं करायचा प्रयत्न करतात. तो इंग्लंडला यशस्वी होतो,तीही मित्राबरोबर आनंदी रहायचा प्रयत्न  करते,विनातक्रार.ती नायकाला सल्ला देते,मसाले पाठवते,त्यांचं नातं तसच घट्ट रहातं.
गेल्या सात आठ दशकापासून सिनेमातल्या हिरो हिराॕईनचे प्रेम जमलेच पाहिजे असा आपला समज आहे.हल्ली हल्ली स्त्री पुरुषाची मैत्री असू शकते,इथंपर्यंत आपली मजल गेलेली आहे. पण मैत्री पलीकडचं एक नाजुक नातं असू शकतं,नव्हे आपल्या बहुतेकांच्या मनातही ते असतं,जे कबूल करणं कठीण असतं.मग आपलं असेल तर आपण मैत्री म्हणतो,दुसर्याचं असेल तर भानगड म्हणतो. ह्या सिनेमातही हा रेशमी धागा आहे,नाजुक  पण चिवट. दोनदा आलेली मिठी ते नातं दाखवते. नेहमी मिठी म्हणजे वासना नव्हे,काहीवेळा भावना व्यक्त  करण्याचं, आधार शोधण्याचं आणि  देण्याचं स्पर्श हे शब्दापेक्षा प्रभावी साधन आहे.
बाकीच्या  व्यक्तीरेखाही आवश्यक म्हणुनच आहेत आणि  खर्या आहेत.नायकाची girlfriend  आजची मुलगी आहे,व्यवहारी ,तीला परदेशातलं संपन्न आयुष्य त्याच्याबरोबर जगायचय.नायिकेची बहिण सामान्य गृहिणी आहे.तीला आपलं आयुष्य सरळ जगायचय,त्याबरोबर बहिणीला सासरकरांनी स्वैपाकीण म्हणुन वागवलेलंही तीला पटत नाही.नायकाचा मित्र आजच्या IT जगाचा प्रतिनिधी,पैसा मिळवणारं मशीन. मावशीबाई आणि  पोपट,पैशासाठी काम करणारे,समजत नसली तरी,नायिकेला समजवून घेणारे,पेपर वाचणारे आजोबा,मूक साक्षीदार.
एक प्रसंग खुप आवडला.नायिकेकडे ८/१० वर्षांची मुलगी भिक मागते,पैसे मोजता न येणारी नायिका तीच्यापुढे पर्स करते,ते निरागस लाचार बाल्य,त्यातली १० रुपयांची नोट घेऊन पर्स परत करते.असा प्रामाणिकपणा आला तरी आपण खुप सुधारू. आणि  लहानपणापासून मनात घर करून राहीलेली भजी विकण्याची इच्छा तीच्या बरोबर पूर्ण करून त्यानी लुटलेला अपरिमित आनंद. खुप गोड प्रसंग.
सुरेख  दिग्दर्शन . नायिकेच्या आयुष्यासारखेच तीचे मळखाऊ रंगाचे कपडे आणि  घरातल्या साध्या स्लीपर. सुंदर ,संयत संगिताचा फक्त  background ला केलेला वापर,खुप effctive.( इथे पिनाकचं,माझ्या भाच्याचं विशेष कौतुक). अत्यंत निगुतीने केलेले देखणे महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ तर चित्रपटाचा मुख्य गाभाच. सोनाली,सिद्धार्थचा सुंदर  स्वाभाविक अभिनय. सिद्धार्थचं विशेष कौतुक . सोनाली समोर तितक्याच ताकदीचा अभिनय करणं म्हणजे खायचं काम नाही.
हे चित्रपटाचं परिक्षण वगैरे नाही. आपल्याच जीवनाची झलक. आजूबाजूला रोज बरच काही घडत असतं.खून,मारामार्या,जातीद्वेष,किळसवाणं राजकारण, अन्याय,भ्रष्टाचार.आपल्यासारख्या संवेदनाशील लोकांना न आवडणारं पण आपल्या control  बाहेरचं.आपणही सहन करत असतोच,अवहेलना,अपमान.पण मग हेच धरून ठेवायचं की छोटे छोटे आनंद शोधायचे? समंजस नाती जास्त अपेक्षा न करता घट्ट टिकवून मनाला गारवा शोधायचा की कोण काय म्हणेल याची चिंता करत आपलच मन चुरगळून टाकायचं?आपल्याला आनंद देणारं कधीतरी काही करायचं की सतत समाजाला मान्य असलेल्या मळल्या वाटांवरूनच चालायचं? प्रत्येक  गोष्टीत,व्यक्तीत चुका आणि खुसपटं काढायची की चांगल काय आहे ते पहायचं? प्रत्येक  परिस्थितीत हातपाय आपटून निराश होऊन बसायचं की जे आहे ते तसच स्विकारून पुढे जायचा मार्ग  शोधायचा? ठरवायचं ज्याचं त्यानीच.
                    विशाखा टिपणीस.
                    १०/०३/२०१८

माझी मैत्रीण

ही पाहिलीत का माझी मैत्रीण वरच्या फोटोतली? काय म्हणता, तुम्ही ओळखता? पांढर्या ड्रेसमधली? लेखिका आणि  प्रसिद्ध  सिनेसमिक्षक सुलभा तेरणीकर...