बालदिन - बालमन


काल एका काकांचा फोन आला. त्यांचा माझा परिचय अगदी अल्प. माझ्या सासूच्या मैत्रीणीचे यजमान. मावशी आमच्याकडे  खूप यायच्या. पण गेली कित्येक वर्षे त्यांना स्मृतिभ्रंश झालाय. मागे एकदा त्यांना भेटून आले मग जाऊ जाऊ म्हणत मागेच पडलं.
तर काय सांगत होते, फोनवर काकांनी परिचय दिला. एकदम नाही आलं लक्षात. काही क्षणांनंतर मला ओळख पटली. तसे काका गरजले, " ट्यूब उशीरा पेटली तुझी!" नंतरचं बरचसं संभाषण मी बरेच दिवसात त्यांच्याकडे  गेले नाही, फोन केला नाही,माझ्या बातम्या त्यांना कशा बाहेरून कळल्या, वगैरे आरोपांच्या फैरी झडल्या. मी माझी बाजू मांडण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होते पण अडचणी सर्वांनाच असतात म्हणत तो परतवला गेला.
मग हळू हळू संभाषणाची गाडी ते कसे बुद्धीमान आहेत,त्यांची अर्थशास्त्रातली Ph.D , त्यांनी आयुष्यात गाजवलेलं कर्तुत्व,त्यांची गाण्याची आवड,अफाट वाचन,नियमित फिरणं,चांगली तब्येत( वय वर्ष ८६),स्मृतिभ्रंश झालेल्या बायकोला ते कसे लहान मुलासारखे सांभाळतात वगैरे अनेक विषयांभोवती फिरली. माझी भूमिका अर्थातच श्रोत्याची.
बोलता बोलता त्यांनी बजावलं १ ते ४ त्यांना disturb करायचं नाही,सात नंतरच फोन करायचा. भेटायला ते म्हणतील तेव्हाच जायचं. त्यांची स्वतःची मुलगी त्यांना गेल्या वर्षात ३/४ वेळा भेटायला आली होती पुण्यातच असून.( काही कारण असेल, मला माहित नसणारं)
फोन बंद करता करता म्हणाले, "फोन कर मधुन अधुन. भेटायला आलीस तर खूप छान छान कविता ऐकवीन तुला, माझ्याकडे  खूप कलेक्शन आहे.
खरं तर मला जरा रागंच आला होता. त्यांचा चेहराही मला स्मरत नव्हता. पण मग एक करारी तरीही केविलवाणा चेहरा माझ्या डोळ्यासमोर आला. तरुणपणातला ताठा संपलेला,परिस्थितीने काळवंडलेला,मीपणा अट्टाहासाने जपणारा,एकाकी ,वृद्ध तरीही जगायची उर्मी असणारा, कोणीतरी श्रोता होऊन आपलं मनोगत ऐकावं अशी अपेक्षा करणारा,केविलवाणेपणा मीपणानी झाकणारा,तरीही माणसातल्या लहान मुलाचा निरागस चेहरा.
             आणि
खूप समाधान वाटलं काकांनी माझी निवड केली श्रोता म्हणून. ठरवलं चांगला श्रोता व्हायचं, अशाच कुणा काका,मावशी किंवा अगदी समवयस्कांचा. आताच्या काळात फार गरज आहे अशा श्रोत्यांची.
पुढे आपण म्हातारे होऊ तेव्हा कदाचित कोणाला ऐकायला सवड नसेल. म्हणून आत्ताच मित्र,मैत्रीणी, आप्त,हितचिंतक  ज्यांना ज्यांना जेव्हा भेटता येईल,बोलता येईल तेव्हा मन मोकळं करू या,त्यांचं मन जाणून घेऊया. माणसात राहू. प्रत्येक  क्षण जगून घेऊ.  मनातलं लहान मुल जागं ठेऊ.
मनातलं लहानमुल जागं ठेवणार्या प्रत्येकाला बालदिनाच्या रंगीत संगित,गोड शुभेच्छा!
विशाखा टिपणीस
१४/११/२०१८

सी.के.पी. खाजाचा कानवला.


सी. के. पी. खाजाचा कानवला.
दिवाळी साजरी करताना दिवाळीच्या फराळाला दिव्यांइतकच अनन्यसाधारण महत्व आहे. आता सर्व  पदार्थ  वर्षभर विकत मिळत असले तरी दिवाळीचा फराळ घरी, स्वतःच्या हाताने बनवायचा आनंद काही औरच.
रव्याचा लाडू हा फराळाचा राजा असला तरी चटकदार चिवडा व खमंग चकलीच भाव खाऊन जाते. ह्या फराळात नाजुक साजुक करंजी  करताना तीचे सांभाळावे लागणारे नखरे आणि  फटाकड्या चकलीपुढे  तीचे सौम्य सात्विकपण जरा फिकेच पडते.
पण ह्या करंजीचाच सख्खा भाऊ "खाजाचा कानवला" समस्त सी.के.पी. घरच्या फराळात अनभिषिक्त सम्राट म्हणून मिरवतो. ह्याला साठ्याची करंजी म्हणणे हा त्याचा घोर अपमान आहे. सी.के.पी. सुगरणपणाचे जे मापदंड आहेत त्यात खाजाच्या कानवल्याचे स्थान फार उच्च आहे.
कानवल्याची वेलदोडा व केशराच्या वासाने घमघमणारी चविष्ट पिठी किंवा सारण तयार करताना कानवला फुटणार नाही असे पदार्थ  चोखंदळपणे त्यात घालावे लागतात. मग रवा किंवा मैदा दूधपाण्यात भिजवून तुप घालत घालत कुटायचा मऊ लोण्याइतका होईपर्यंत, ( ह्या क्रियेत सुगरणी डोळ्यासमोर नवरोबांना आणतात) मग तुपात  तांदुळाची पिठी किंवा काॕर्न फ्लाॕवर घालून आपण आवडतं गाॕसिप जितकं फेसतो तस्सच भरपूर फेसायच. मग पिठाची पोळी लाटून तीला बोटाने खड्डे पाडून त्यावर फेसलेली पिठी ( मला नक्की  शब्द आठवत नाही, बहुतेक साटा )पसरायची. अशा एकावर एक रंगीत पोळ्या ठेऊन त्यांची वळकटी वळायची आणि  त्याच्या लाट्या करायच्या. आता हे प्रकरण भलतच नाजुक  असत. कोणी तशाच दाबून लाटतात तर कोणी पगड्या वळून लाटी लाटतात. पिठ न लावता हलक्या हाताने एकाच बाजूने पुरी लाटायची. मग त्यात सारणही नाजुक  हातानी पण गच्च भरायचं (खुळखुळे चालत नाहीत.) मग कानवला नीट बंद करून तुपात झार्यानी तेल उडवत एकाच बाजूने तळायचा.तळताना त्याला नाजुक  पंख फुटु लागतात. जसजसे पापुद्रे सुटतात तसतसे सी.के.पी. सुगरणीच्या मनात आनंद तरंग उठु लागतात. हे अलवार कानवले तुप निथळवून अलगद ठेवावे लागतात. ही साधना पूर्ण  पेशन्स् ठेऊन,एखादं तप करावं तशा भक्तिभावानी करावी लागते. त्याचं सार्थक नर्कचतुर्दशीला नैवेद्य  दाखवून खाणार्यानी तोंडात टाकताच मधुर चव तोंडात घोळवत कानवला विरघळला कि वाह म्हणून डोळे मिटून दाद दिली की होते.
हे कानवला पुराण सी.के.पी.जातीचा उदोउदो करण्यासाठी नाही. प्रत्येक जातीत असे चविष्ट मानदंड असतात. एरवी जातपात मानू नये पण प्रत्येक जातीने आपली वैशिष्ट्यपूर्ण  खवैय्येगिरी सर्वांशी शेअर करावी. ह्या वर्षी फेसबुकच्या कृपेमुळे असंख्य  सुगरणींनी केलेले सुंदर  पापुद्रे सुटलेले,रंगीत,शुभ्र,दोन रंगांचे, चटईचे,गुलाबफुलांचे असे लाखो कानवले पहायला मिळाले आणि  डोळे तृप्त  झाले. शतकानु शतके अशा परंपरा जपणारी आपली संस्कृती खरच  थोर आहे. (कृती सांगताना काही चूकभूल झाली असल्यास सी.के.पी. सुगरणींनी कृपया माफ करावे.)
विशाखा टिपणीस.
८/११/२०१८

माझी मैत्रीण

ही पाहिलीत का माझी मैत्रीण वरच्या फोटोतली? काय म्हणता, तुम्ही ओळखता? पांढर्या ड्रेसमधली? लेखिका आणि  प्रसिद्ध  सिनेसमिक्षक सुलभा तेरणीकर...