Mothers day in marathi


आज जागतिक  मातृदिन. आपल्या हिंदू संस्कृती  प्रमाणे प्रत्येक  दिवसच माता, पिता, गुरु आणि  सार्या चराचर सृष्टीच्या उत्सवाचा असतो.पण आता धावपळीच्या आयुष्यात एक दिवस का होईना मातृदिन छान साजरा व्हावा.
पूर्वी म्हणजे लहानपणी आपण आईच्या प्रेमाची महती सांगणारी गोष्ट ऐकली आहे . मुलाच्या प्रेयसीने आईचे काळीज मागितले, ते घेऊन जाताना मुलगा पडला तेव्हा त्या काळजानी विचारलं " बाळा, तुला लागलं तर नाही?"
मला वाटतं ही गोष्ट जुनी झाली आता. निदान आपल्या पिढीतल्या बर्याचशा आया, सुशिक्षित अगर अशिक्षित , निदान आर्थिकदृष्ट्या  स्वतंत्र आहेत. आणि  त्यामुळे थोड्या खंबीरसुद्धा. घरातल्या मोठ्यांची काळजी घेऊन, मुलंही मोठी झाल्यावर, कौटुंबिक  जबाबदार्या पार पाडल्यावर आमची कर्तव्य संपली का? अजुन अंगात शक्ती आहे मुख्य म्हणजे मन ताजं तवानं आहे, काहीतरी करायची इच्छा  आहे, तर मग आपल्या मातृभूमीसाठी जे करायचं बाकी आहे ते आपापल्या आवडीनुसार, कुवतीनुसार का करू नाही?खरंतर आपल्या वयाचे खूपसे लोक हे करतातच.
१) आपली मातृभूमी म्हणजे जमीन , झाडं,फळं,फुलं, पशु,पक्षी,पाणी,नद्या,निर्झर, समुद्र ,एकंदर पर्यावरण.
एखादच का होईना झाड लावून, त्याचं संगोपन करून,घरच्याच कचर्याचं खत तयार करून, परिसर स्वच्छ ठेऊन ,पाणी  वाचवून, नदीनाल्यात कचरा न टाकून , आणि  या सर्वाबद्दल इतरांना जागृत करून, मातृभूमीची सेवा म्हणजे पर्यायाने आपण स्वतःलाच मदत करीत असतो ना?
२) आपला इतिहास.
खरोखरीचे भाग्य म्हणुन आम्हाला इतक्या महान संस्कृतीचा, गौरवशाली इतिहासाचा वारसा लाभला. फक्त  गुलामगिरीचा शिकवलेला इतिहास आणि जातीभेद, धर्मभेद,आपल्या संस्कृतीची लाज बाळगणं हे सोडून आमचा खरा इतिहास, संस्कृती  ह्याचा अभ्यास करू, इतरांनाही समजावून देऊ.अभिमानाने म्हणु आम्ही भारतीय एक आहोत, भले आमचे धर्म, जाती, भाषा,रुढी,परंपरा,पोषाख,वेगळे असतील. दुफळी माजवणार्या घटकांना दूर ठेऊ. भारताच्या  स्वातंत्र्यासाठी लढलेल्या प्रत्येक  क्रांतीकारकाची, समाजसुधारकाची आदराने आठवण ठेऊ.
३) समाज.
     सर्वांशी सुसंवाद साधणं,लहान मुलांना चांगले संस्कार  देणं, नियमानी वागणं, भारतीय घटनेचा मान ठेवत आपल्या हक्कांची आणि  कर्तव्यांची जाण ठेवणं व इतरांना ती करुन देणं.जिथे आवश्यक आहे व शक्य आहे तिथे यथाशक्ति  अर्थिक, वैचारिक अगर श्रमाची मदत करणं इतकं तर आपण करु शकतो.पण कुणालाही सतत फुकट घेण्याची  सवय मात्र लागू नये. आपल्या रक्षणासाठी लढणारे सैनिक, अन्न पुरवणारे शेतकरी, पोलीस व इतर सर्व  सेवा पुरवणार्यांसाठी कृतज्ञ राहून छोटी मोठी कामे करू शकतो.
४)देशाचा अभिमान
देशप्रेम हा ऐच्छिक  विषय नाही. तुमचं अस्तित्वच ज्यांच्यामुळे आहे ते आई,वडील आणि  देश यांचा मान ठेवलाच पाहिजे. तिरंगा, राष्ट्रगीत, राष्ट्रीय संपत्ति, देशाची घटना, देशाचा प्रत्येक  नागरिक , विशेषतः स्त्रिया  व वृद्ध यांचा मान राखला गेलाच पाहिजे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली वरील गोष्टींचा  अपमान करणार्यांनी देशातून बाहेर जावे.
मला वाटतं आज मातृदिनाच्या निमित्ताने आपण आपल्या मातृभूमीच्या ऋणाचे स्मरण करून एखादा छोटासा का होईना संकल्प करूनआपल्या मातृभूमीप्रती  कृतज्ञता व्यक्त  करू या.
विशाखा टिपणीस
१२/०५/२०१९

No comments:

Post a Comment

माझी मैत्रीण

ही पाहिलीत का माझी मैत्रीण वरच्या फोटोतली? काय म्हणता, तुम्ही ओळखता? पांढर्या ड्रेसमधली? लेखिका आणि  प्रसिद्ध  सिनेसमिक्षक सुलभा तेरणीकर...